TOD Marathi

मुंबई | शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिस बजावली. मात्र, अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नार्वेकरांना नोटिसची वेळ संपली असून कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (२३ ऑगस्ट) मुंबईत बोलत होते.

राहुल नार्वेकर म्हणाले, “आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्यावेळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल.”

हेही वाचा ” …शरद पवारांचा इशारा, अन् अजित पवार गट नरमला; अखेर…”

आमदारांना सुनावणीसाठी कधी बोलावलं जाईल यावर राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. “लवकरच सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. तसेच नियमांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली.